
बीड (प्रतिनिधी) भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली त्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी भगवान गड गाठत शास्त्रींना पुरावे दिले. त्यानंतर आज नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबाच सांत्वन केलं.दु:खाची तीव्रता संप्रदाय कमी करु शकतो . तसेच त्यांना न्याय मिळावा असे देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी सरपंच संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख, लेक वैभवीचे कौतुक केले.

शिवाजी महाराज म्हणाले, देशमुख कुटुंब डोंगराएवढ्या मोठ्या संकटाला, दु:खाला सातत्याने सामोरे जातय . या अन्यायाला न्याय मिळावा. संकटातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वाराने मनोधैर्य द्यावे. प्रत्येक जण या कुटुंबासोबत होते. संत परंपरा प्रत्येकाकडे मानवतेने, समतेने पाहते.नामदेव शास्त्री हे संतपीठावरील व्यक्ती आहे मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नाही. आम्ही आमच्या किर्तनात सांगतो की, ज्या क्षणी माणसाच्या मनात एक वेगळी भुमिका आली. तर त्या पीठाकडे त्या व्यक्तीकडे पाहताना माणसाचा दृष्टीकोन बदलतो. त्यांच्या बोलण्यातील काय भुमीका असेल ती त्यांना माहित आहे.
साधु- सतांनी समाजाला संस्कार द्यावे : शिवाजी महाराज
मस्साजोगमध्ये आम्ही संत, महंत आले देशमुख कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलो आहे. नारायण गाडावर देशमुख कुटुंब दर्शनसाठी आले होते पण आम्ही बाहेरगावी गेल्याने भेट झाली नाही फोनवरून संपर्क झाला होता. डोंगरासारख्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आम्ही मुद्दाम कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. राजसत्तेने समाजाला सुविधा द्यावी तर साधु- सतांनी समाजाला मानवतेची शिकवण द्यावी, संस्कार द्यावे. माणसाने माणसाकडे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहावे. सामाजिक शांतता सुव्यवस्था राखावी. संतोष देशमुख यांच्या हत्येचं महाराष्ट्रातील नाही तर जगभरातील अनेक लोकांना हे दु:ख आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे, असे शिवाजी महाराज म्हणाले.
शिवाजीमहाराजांची मस्साजोगला भेट
देशमुख कुटुंब रविवारी नारायण गडावर दर्शनासाठी गेले होते. मात्र यावेळी देशमुख कुटुंब आणि महंत शिवाजी महाराज यांची भेट झाली नाही. त्यामुळे आज महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबाची भेट झाली. शिवाजी महाराज यांच्या सोबत महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांची उपस्थिती होती. श्रीक्षेत्र नारायणगड आणि आम्ही देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले आहे.