
बीड(प्रतिनिधी) मुंडे बंधू-भगिनीसह जिल्ह्यात डॉक्टर,व्यापारी,पत्रकार,साहित्यिक,कलाकार,मान्यवर ,नागरिक यांना सोबत घेऊन बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असून यासाठी सतत साऱ्यांच्या संपर्कात राहणार आहे, कुठलाही भेदभाव न करता काम केले जाईल अशी ग्वाही नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.बीड-नगर-परळी हा रेल्वेमार्ग बीडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. मागच्या तीस ते चाळीस वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी विविध आंदोलने झालेली आहेत. आता कुठे हा मार्ग टप्प्यात आला आहे.नगर ते बीड रेल्वे रुळ अंथरण्याचं काम पूर्ण झालं असून पुढे परळीपर्यंत ही रेल्वे जाईल.
नगर-बीड असा रेल्वेमार्ग सुरु झाल्यानंतर याच मार्गावरुन आता बीड-मुंबई अशी रेल्वेगाडी सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. त्यासंदर्भात अजित पवार यांनी गुरुवारी सूतोवाच केलं.
अजित पवार म्हणाले की, बीडमधील डॉक्टर, व्यापारी आणि समाजातल्या विविध प्रतिनिधींची बैठक मी पुढे घेणार आहे. पत्रकार, साहित्यिक, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे. चांगल्या इमारती कशा उभ्या करता येतील, हे बघावं लागेल. विविध योजना, विकासकामे, पाण्याचे, स्वच्छतेचे प्रश्न सोडवले जाणार आहे.
पवार पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळातले दोन सहकारी आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना विश्वासात घेऊन आणि कुठलाही भेदभाव न करता आपल्याला पुढे जायचं आहे. मी जर भेदभाव करत नसेल तर मी ज्यांचं काम करतोय त्यांनीही खाली भेदभाव केला नाही पाहिजे. मी काम करणार ते आणि खाली हे तिसरंच काहीतरी करणार, हे मी खपवून घेणार नाही. त्याला सरळ सांगणार, तू जर दुटप्पी वागणार असशील तर मी तुझं काम करणार नाही. मी साधुसंत नाही, मी सरळमार्गी आहे. मी जरुर सगळ्यांना मदत करेन, जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल तर त्यांना सरकारचा आधार आहे.
चुकीचे पायंडे बंद करा
”तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले तर उद्योगपती येऊन इथे गुंतवणूक करणार आहेत. तुमच्याकडे काही साईड पवनचक्क्यांसाठी उपयुक्त आहेत, काही साईड सोलरसाठी चांगल्या आहेत. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याशिवाय मुंबई-बीड रेल्वे सुरु करण्यासंदर्भात मी प्रयत्न करणार आहे. या रेल्वेमार्गाचं बीडपर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे. बीड शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. प्रत्येक तालुका आपला आहे. ही भावना तुमच्या मनात का येत नाही? कुठे चांगलं काम होत असेल तर त्याची स्पर्धा झाली पाहिजे.” असं अजित पवार म्हणाले.