
बीड (प्रतिनिधी) मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. यामुळे त्यांना आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली. सरकारी वकीलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. याप्रकरणी आरोपी आता जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात.
वाल्मीक कराडच्या पोलीस कोठडीवर बीडच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना न्यायालय परिसरातच जोरदार घोषणाबाजी झाली होती. दोन गट समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीमारदेखील करावा लागला.
सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. न्यायालय आवारात सुनावणी वेळी होत असलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी देखील घेतली होती. सुरेखा पाटील यांच्या निकालानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
दरम्यान वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे वाचवतात असा आरोप आ संदीप क्षीरसागर यांनी केला आहे,त्यांनी म्हंटले आहे की,”मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की, एकतर मास्टरमाईंड म्हणून ते आहेत. त्यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण मिळत आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर होतात आणि प्रशासनाला समोर जातात. सरेंडर झाल्यावर अंगावर गमछा, हातात दोरे असतात, तशीच ट्रींटमेंट त्यांना भेटते. त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. त्या कालावधीमधले मोबाईलचे सर्व सीडीआर तापसले, तर सर्वकाही लक्षात येईल”, अशी खळबळजनक प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.