

मुंबई -राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत होते ती बातमी आली आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयाची अधिकृत घोषणा तातडीने करण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.या कर्जमाफीच्या अटी आणि शर्तींचे सविस्तर परिपत्रक जारी करण्यात येणार असून त्यांनतर योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाने या योजनेला अंतिम मंजुरी दिली.

या योजनेचा थेटलंभ राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणारे असून राज्यभरातील ६५ लाखांहून अधिक कर्जखात्यांचा समावेश या निर्णयात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी हा आतापर्यंतच्यामोठ्या निर्णयांपैकी एक मानला जात असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या निर्णयाची औपचारिक घोषणा आणि अंमलबजावणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केली जाणार आहे. त्यानंतर सहकार विभागाकडून पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहिती जाहीर केली जाईल.असे सांगण्यात येत आहे.
