
स्वा.सावरकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
बीड (प्रतिनिधी) देशातील तळागाळातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून भारतरत्न नानाजी देशमुख यांनी आपल्या ग्रामविकासाच्या कार्याची उभारणी केली, त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. विजय फुलारी यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी ‘भारतरत्न नानाजी देशमुख अँन आर्किटेक ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते झाले,या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर,कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, दीनदयाळ शोध संस्थान सचिव अभय महाजन,दीनदयाळ शोध संस्थान संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, निखिल मुंडले, प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, परिषदेचे निमंत्रक उपप्राचार्य डॉ. उत्तम साळवे,यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. विजय फुलारी म्हणाले की भारतरत्न नानाजी देशमुख यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले. अशा राष्ट्रीय परिषदांमधून त्यांच्या विचारांचे मंथन होत आहे ही आनंदाची बाब आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांचे विचार प्रेरणादायी असून ते समाजाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणारे आहेत. प्रमुख अतिथी डॉ. उपेंद्र कुलकर्णी म्हणाले की बीड जिल्ह्यात नानाजींचे मोठे काम आहे, त्यांच्या ग्राम विकासाच्या कार्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. नानाजींच्या विचारांची मांडणी समाजासमोर होणे आवश्यक आहे. अध्यक्ष समारोपात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर म्हणाले की समाजाच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना नानाजींनी मांडली. या परिषदेच्या माध्यमातून त्यांचे विचार निश्चितपणे समाजासमोर जातील.


प्रास्ताविकात प्राचार्य सुहास मोराळे म्हणाले की नानाजींचे ग्रामविकासाचे प्रेरणादायी विचार समाजासमोर जावेत यातून नवनिर्मिती व्हावी हा या परिषदेच्या आयोजनाचा हेतू आहे. यावेळी डॉ. मेधा गोसावी लिखित ‘अवचिता परिमळु’ या कविता संग्रहाचे आणि परिषदेच्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी ला पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य उमेश जगताप,संजय गुरव,रवींद्र देशमुख, प्रमोद कुलकर्णी, संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. उत्तम साळवे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी यांची उपस्थिती होती. उद्घाटना नंतर परिषदेच्या बीज भाषणात अभय महाजन यांनी नानाजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.