
प्रयागराज – प्रयागराज संगमावर मंगळवारी रात्री साधारण दीड वाजता चेंगाराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत 14 भक्तांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र प्रशासनाने अद्याप मृत आणि जखमींची संख्या याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आज मौनी अमवस्ये निमित्तचा दुसरा अमृतस्नान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी संगम नोज येथील गर्दीमुळे हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
कुंभमेळ्यात संगम घाटावर मंगळवार-बुधवारच्या रात्री साधारण एक ते दीड वाजताच्या दरम्यान गर्दी वाढली आणि काही महिला खाली पडल्या, लोकांनी त्यांना तुडवत पुढे जाण्यास सुरुवात केली. या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी असल्याचे महाकुंभच्या प्रशासकीय अधिकारी अकांक्षा राणा यांनी सांगितले.माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, संगम घाट मार्गावर काही गडबड झाली, बॅरियर्स तुटले आणि चेंगराचेंगरी झाली. त्यातील काही लोक जखमी आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अद्याप जखमीची संख्या समोर आलेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार ही दर्घटना संमग नोज येथे 11 ते 17 क्रमांक पोल दरम्यान झाली आहे. घटनास्थळी अॅम्ब्यूलन्स दाखल झाल्या आहेत. जखमींना तातडीने कुंभमेळा येथे तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एका जखमी व्यक्तीच्या नातेवाईक महिलेने सांगितले की, अचानक कोणी तरी म्हटले की, लोक मेले आहेत, त्यानंतर ती खाली पडली. महिलेने सांगितले की मी कोणालाही मेलेलं पाहिलं नाही. मात्र काही लोक म्हणत होते की येथे काही जणांचा मृत्यू झाला, हे ऐकताच मी खाली पडले. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, ज्या ठिकाणी ही घटना झाली तिथे प्रशासनाची कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हती. गर्दीमध्ये सगळे दबले आणि मागून लोकांचा रेटा वाढत होता.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाने अखाडा परिषदेला आजचे शाही स्नान रद्द करण्याची विनंती केली. सर्व प्रमुख 13 अखाड्यांनी आज मौनी अमवस्येनिमत्तचे अमृस्नान रद्द केले आहे. अखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी म्हटले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची माहिती घेतली.
कुंभमेळ्यातील या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. संगम नोज भागात भक्तांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, आणखी गर्दी वाढू नये यासाठी प्रयागराज शहराच्या सीमेवरील श्रद्धाळूंना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रयागराज शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्येच श्रद्धाळूंना थांबवण्यात येत आहे.
महाकुंभमध्ये आज मौनी अमवस्याचे पवित्र स्नान आहे. त्यामुळे भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. एका आकडेवारीनुसार साधारण 5 कोटी लोक शहरामध्ये आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार संगम घाटासह 44 घाटांवर आज उशिरा रात्रीपर्यंत 8 ते 10 कोटी भक्त स्नानासाठी-डुबकी मारण्यासाठी येऊ शकतात.