
मुंबई (प्रतिनिधी) पहिला वहिला खो-खो वर्ल्ड कप नुकताच दिल्लीमध्ये पार पडला. या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने रविवारी (१९ जानेवारी) विजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळला ७८-४० फरकाने पराभवाचा धक्का दिला.यासह भारतीय संघाने पहिलाच वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
मुळची महाराष्ट्रातील बीडची असलेल्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यात वर्चस्व ठेवले होत. त्यांनी नेपाळला कोणत्याही क्षणी पुनरागमनाची संधी दिली नाही.अंतिम सामन्यात भारतीय संघाचा चपळ खेळ पुन्हा दिसून आला. महिला संघाने सांघिक कामगिरी आणि अचूक रणनीतीमुळे नेपाळला पराभवाचा धक्का दिला. चपळाई, अचूकता आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी या सामन्यात एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं होतं. भारताच्या या विजयाचे देशभरातून कौतुक होत आहे.

अंतिम सामन्यात पहिल्या राउंडमध्ये भारताने आक्रमक सुरुवात केली. भारताने नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदातच बाद केली. त्यानंतर दुसरी तुकडी १.४८ मिनिटात, तिसरी तुकडी १.२० मिनिटात, तर चौथी तुकडी १ मिनिटात बाद केली. पाचवी तुकडी ४५ सेकंदात बाद केली, त्यानंतर उर्वरित २ खेळाडू ३४ सेकंदात बाद केले. त्यामुळे भाकताने ३४ गुण मिळवले. भारतासाठी कर्णधार प्रियंका इंगळे, रेश्मा राठोड यांची कामगिरी चांगली राहिली.

दुसऱ्या राउंडमध्ये नेपाळनेही कमालीचा खेळ केला होता आणि भारताच्या ड्रीम रन गुणांना वेसन घातले. भारताची पहिली तुकडी ३ मिनिटानंतर बाद झाली. दुसरी तुकडी १.३९ मिनिटात बाद करण्याच नेपाळने यश मिळवले, तर तिसरी तुकडी ५३ सेकंदातच बाद झाल्याने भारताला धक्का बसला होता. पण नेपाळने चौथी तुकडी १.१३ मिनिटात बाद केले. मात्र पाचवी तुकडी नाबाद राहिल्याने भारताने मध्यंतरापर्यंत ३५-२४ अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या राउंडमध्ये भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४२ मिनिटात बाद केली. त्यानंतर दुसरी तुकडी ३३ सेकंदात, तिसरी तुकटी १.७ मिनिटात बाद केली. चौथी तुकडी ५० सेकंदात माघारी परतली. पाचव्या तुकडीला ५५ सेकंदात, तर सहाव्या तुकडीला ३४ सेकंदात बाद केले. सातव्या तुकडीतही एक खेळाडू बाद झाली. त्यामुळे भारताने ७३-२४ अशी आघाडी घेतली. नेपाळकडून दीप बी केने चमकदार खेळ केला.
चौथ्या राउंडमध्ये नेपाळला संघर्ष करायला लावला. भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मिनिटांचा वेळ घेतला. त्यामुळे भारताने हा सामना ७८-४० असा जिंकला.या स्पर्धेत साखळी फेरीत भारताने दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशवर विजय मिळवला, तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.
या विजयानंतर प्रियंकाने म्हटले की हा विजय केवळ आमच्या संघाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या स्वप्नांचा विजय आहे. या विश्वचषकासाठी आम्ही महिनोंमहिने कष्ट घेतले, प्रत्येक खेळाडूने आपले १०० टक्के योगदान दिले, आणि आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. नेपाळसारख्या पहाडी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना दबाव मोठा होता, पण आम्ही एक संघ म्हणून उभे राहिलो आणि प्रत्येक क्षणी एकमेकांना पाठिंबा दिला.’
‘हा विजय आमच्या टीमवर्कचा आणि भारतीय महिलांच्या अस्मितेचा सन्मान आहे. खो-खो हा खेळ आमच्या परंपरेचा एक भाग आहे आणि आता तो जागतिक पातळीवर पोहोचला आहे, ही भावना खूप अभिमानाची आहे.”प्रत्येक लहान मुलीला सांगू इच्छिते की, तुमचं स्वप्न कितीही मोठं असो, ते पूर्ण होऊ शकतं. फक्त मेहनत, विश्वास आणि जिद्द पाहिजे. आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार, याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे.’