
मुंबई (प्रतिनिधी)- संतोषबदेशमुख हत्या प्रकरणात शासन कठोर भूमिका घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देईल. कुणीही दोषी असेल तरी त्याला सोडणार नाही, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केलेली असताना मी जर त्यावर बोलले तर मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखविण्यासारखे होईल.तपास यंत्रणा त्यांचे काम करीत असताना मी त्यावर बोलणे उचित होणार नाही, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी दिले.
दोन कोटींची खंडणी आणि त्यातून झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला झालेल्या अटकेमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सर्वपक्षीयांकडून मागितला जात आहे. केवळ विरोधकच नाही तर सत्ता पक्षातल्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी आक्रमकपणे बाजू लावून धरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी पंकजाताई मुंडे यांना प्रश्न विचारले.
बीड प्रकरणावर आपली काय?
बीड प्रकरणावर आपली काय भूमिका आहे असे विचारले असता, सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीरपणे भूमिका मांडलेली असताना मी त्यावर बोलणे योग्य नाही. रोज रोज भूमिका मांडणे म्हणजे त्यांच्या दु:खाला उगाळण्यासारखे होईल. निर्घृण फक्त हत्या नसते. व्यवहारही असतो, परिवारच्या बाबतीत घटना घडल्यानंतर त्यातून आपण काहीतरी खाद्य मिळवत असू तर ते चुकीचे आहे, असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता, मला काय वाटतंय हे कसं सांगू?
देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणा त्यांचे काम करतायेत. या प्रकरणात कोण कोण दोषी आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मी कुणाचे नाव कसे घेऊ? जो कुणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. संतोष देशमुखच्या लेकरांना पाहून मला काय वाटतं, हे मी तुम्हाला काय सांगू? तो माझा कार्यकर्ता होता, असे भावनिक सुरात पंकजाताईंनी सांगितले.
परळीत वंजारी समाजाचेच बहुतांशी अधिकारी कसे काय?
तसेच परळीत वंजारी समाजाचेच बहुतांशी अधिकारी कसे काय? या प्रश्नावरही पंकजाताईंनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, कोण अधिकारी कुणाचे? कोण अधिकारी कुठून आलेत? याचे मी काय उत्तर देऊ? हे अधिकारी मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी, तेव्हाच्या यंत्रणेने हे अधिकारी आणलेत. गेली पाच वर्षे मी राज्याच्या राजकारणाच्या बाहेर होते. मी मध्य प्रदेशची प्रभारी होते. साधी आमदारही नव्हते. त्यामुळे मी यावर काय बोलू? असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.