
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) एअरटेल, बीएसएनएल, जिओ, आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना परवडणाऱ्या व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन्स सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.2G वापरणाऱ्या ग्राहकांसाठी डेटा न वापरणाऱ्या योजना आणण्याचा आदेश TRAI ने दिला आहे, ज्यामुळे देशभरातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.
2G वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र योजना
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश रिचार्ज प्लॅन्समध्ये डेटा पॅकचा समावेश असल्याने जुने फीचर फोन वापरणाऱ्या किंवा 2G नेटवर्कवर असलेल्या ग्राहकांना जास्त खर्च येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी TRAI ने स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, जे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी असतील.
ग्राहकांच्या गरजांवर भर
TRAI चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, डेटा वापराला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, परंतु ग्राहकांवर ते लादले जाऊ नये. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडता येईल, यासाठी TRAI प्रयत्नशील आहे. कंपन्यांना स्वतःच्या योजनांचे प्रमोशन करण्याची मुभा आहे, पण ग्राहकांसाठी अनुकूल पर्याय देणे बंधनकारक आहे.
365 दिवसांच्या वैधतेचे नवीन नियम
TRAI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपन्यांना रिचार्ज व्हाउचर्सची वैधता 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन पर्याय मिळतील. याशिवाय, रिचार्ज कूपनवर रंगकोडिंग (कलर कोडिंग) करण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. मात्र, ₹10 च्या किमान रिचार्जचा नियम 2012 च्या आदेशानुसार कायम ठेवण्यात आला आहे.
ग्राहकांसाठी आर्थिक दिलासा
नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना परवडणाऱ्या दरात व्हॉइस आणि एसएमएस सेवा मिळतील. यामुळे, जुने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आणि डेटा न वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठा दिलासा मिळेल.
, TRAI ने डिजिटल डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या पूर्वपरवानगीचे डिजिटल सत्यापन करण्यासाठी या महिन्यात पायलट प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाद्वारे ग्राहकांना वाणिज्यिक संदेशांमधून (Commercial Communications) बाहेर पडण्याचा (Opt-out) पर्याय मिळणार आहे.
TRAI च्या या निर्णयामुळे मोबाईल सेवा अधिक पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होणार आहेत. कमी खर्चात चांगल्या सुविधा देण्याच्या या प्रयत्नामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि टेलिकॉम कंपन्यांनाही अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.