
यशवंतराव चव्हाण म्हणाले असतील, वेलडन देवेंद्र….!गेल्या दोन अडीच वर्षातली, उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली
राजकीय दुष्मणी उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र, 17 डिसेंबर रोजी एक फोटो व्हायरल झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला सुरू असलेला सुसंवाद..! हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटले असणार…! तसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांना शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे , नाना पटोले, संजय राऊत यांनी अगदी ठरवून टारगेट करून यथेच्छ शिव्याशाप दिलाय. उद्धव ठाकरे यांनी तर सगळ्या पायर्या पार करून, फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टिका केली. ठाकरेच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले. टर्रर्रबूज, एकतर तू राहशील, नाहीतर मी राहील. अरे काय हा…तुमचा नागपूर चा कलंक, हा फडतूस गृहमंत्री, नालायक…!अशी शेलकी विशेषणे लावून फडणवीस यांना ठाकरेंनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. उद्धव ठाकरे हे स्वतःला मा. बाळासाहेब ठाकरे समजायला लागले होते.
मी पून्हा येईन, या टॅग लाईनची टिंगल टवाळी करण्यात आली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शब्द खरा करून दाखविला. आता, ते पून्हा आलेत.मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर बस्ती मत बसा देना, मै समंदर हू, लौटकर वापस आऊंगा..! मी पून्हा येईन, हे शब्द ज्या जोशात फडणवीस यांनी म्हटलेत, त्याच जोशात फडणवीस यांनी कालच्या विधानसभेत कमबॅक केले आहे. विरोधकांची तोंडेच बंद झालीत. शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस चे अनुक्रमे 10, 20 16 आमदार निवडून आलेत.
लोकांनी जनादेश दिला आहे. आता ,नव्याने सुसंवाद व्हावा, अशी अपेक्षा आहे.मुळ शिवसेना [ उद्धव बाळासाहेब ठाकरे ] फुटली. या आधी ही ती अनेकदा फुटली. मात्र, दोन वर्षा पूर्वी शिवसेनेला भगदाड पडले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पन्नास आमदार फुटल्याने, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा राग शिंदे यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त आहे. शिवसेना फुटली ती केवळ फडणवीस अर्थात भाजपा च्या षडयंत्राने, असा समज उद्धव ठाकरे यांना झालेला आहे. वास्तविक पाहता, शिवसेना फुटी मागे स्वतःच उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे , संजय राऊत यांचीच कार्यपद्धती होती. त्यामुळे, कोणत्याही नेत्यांनी तारतम्य ठेवून वागावे, बोलावे, अशी किमान अपेक्षा असते.
महाराष्ट्राला एक सुसंस्कृत वारसा लाभलेला आहे. कितीही, राजकीय हेवेदावे होऊदेत. शेवटी, महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन, सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये उत्तम समन्वय असलाच पाहिजे. फडणवीस यांनी नेहमीच संयम ठेवून काम केलय. ते टोकाचा विरोध कधी करत नाहीत. स्वपक्षातील किती लोक त्यांच्या अंगावर आले. कुणी समोर आले, कुणी पडद्याआडून आले. एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे , सुधीर मुनगंटीवार, किती नावे घ्यायची. मात्र, संयम ठेवून फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक विचार ठेवला.
देवेंद्र फडणवीस यांच्यातला सुसंस्कृत नेता पून्हा एकदा महाराष्ट्राने पाहिला. पाहुणचार हा महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन मुख्यमंत्री झालेल्या फडणवीस यांचे अभिनंदन केले. अभिनंदन करून झाल्यावर, देवा भाऊंनी एकाच क्षणात, उद्धवजींना बसा ना..! असा आग्रह केला. जो माणूस आपल्याला शिव्याशाप देतो. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधीला, फोन करून ही येत नाही. आपल्या विषयी टोकाची कटुता ठेवतो. त्याच माणसाला सन्मानाने बसायचा आग्रह धरतो. हे राजकीय संस्कार आहेत. महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील सारख्या नेत्यांनी हा वारसा निर्माण केला. तो अबाधित राहील, या साठी देवा भाऊ सारखे अनेक नेते महाराष्ट्र धर्माला जागून काम करतात. याचे खूप मोठे समाधान मानले पाहिजे. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी सांगितलय, मेल्यावर वैर संपून जाते. मग, जिवंत पणी कशाला वैर ठेवायचे. या अर्थाने, उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी मागचा उद्देश असला पाहिजे. सुरूवात देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 13 कोटी जनतेचा लोकसेवक पुढे होऊन टाळी द्यायला सरसावला आहे. हे चांगले चिन्ह आहे.
महाराष्ट्राला सर्व आघाडय़ांवर पुढे घेऊन जायचे असेल तर, राजकीय कटुता ठेवू नये. तुटेपर्यंत कशाला उगाच ताणायचे. तेवढे शहाणपण सर्वांनी ठेवले पाहिजे. ते जपले पाहिजे, महाराष्ट्राच्या हितासाठी. महाराष्ट्रा पुढे अनेक प्रश्न उभे आहेत. शेती, सिंचन आणि बेरोजगारीची मोठी समस्या आहे. त्यासाठी, सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, विधिमंडळात काम करण्याची गरज आहे. सत्ताधारी- विरोधकांच्या भेटीने माहोल सद्गदित झाला आहे. संयमी, धाडसी, सरळ, साधा, जीवलग, चतुर, प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण ही म्हणाले असतील, व्वा देवेंद्र, वेलडन..!
सुभाष सुतार , पत्रकार ,बीड.
