
इंडियन प्रीमियर लीग २०२५ लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या. दरम्यान, यंदाच्या लिलावात १३ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याचाही समावेश होता.
त्यामुळे त्याच्यावर बोली फ्रँचायझी लावणार की नाही अशी शंकाही व्यक्त होत होती. पण त्याला कोट्यवधी रुपयांची बोली लावली गेली.
लिलावात ३० लाख मुळ किंमत असलेल्या वैभवची दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच चुरस होती, अखेरीस राजस्थानने बाजी मारली. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या राजस्थानने त्याच्यासाठी १.१० कोटी बोली लावत त्याला संघात घेतले.
त्यामुळे तो आयपीएलमध्ये बोली लागलेला सर्वात लहान खेळाडूही आहे. आता जर त्याला राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर त्याला पदार्पणाचीही संधी मिळेल.
२७ मार्च २०११ मध्ये बिहारमधील समस्तीपूर येथे जन्मलेल्या वैभवने यापूर्वीच त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवलेली आहे. त्याने २०२३-२४ रणजी ट्रॉफी स्पर्धेत जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी पदार्पण केले होते. त्यावेळी त्याचे वय १२ वर्षे २८४ दिवस होते. त्यामुळे तो रणजीमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता.
त्याची नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या युवा संघांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी त्याने अवघ्या ६२ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो १३ वर्षे १८८ दिवस इतक्या वयाचा होता. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात युवा खेळाडूही ठरलेला.इतकेच नाही, तर युवा क्रिकेटमध्ये भारतासाठी कसोटीत सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम त्याने केला होता. त्याने ५८ चेंडूत शतक केले होते. त्याने मनज्योत कार्ला (१०१ चेंडू) आणि शुभमन गिल (१०९ चेंडू) यांचा विक्रम मोडला होता.
त्याने ५ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ६३ च्या सरासरीने १०० धावा केल्या असून ४१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने १ विकेटही घेतली आहे. आता तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात दिसणार आहे.