
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २३ नोव्हेंबरला हा निकाल लागणार आहे. दरम्यान एक्झिट पोल्स समोर आले आहेत.एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार राज्यात महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीचं सरकार येईल असंही म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करीत ब्राम्हण समाजाला विनाकारण टीकेचे लक्ष केले आहे,याबद्दल ब्राम्हण समाजात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल. मतदान झाल्यानंतर जे कौल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं नाना पटोले यांनी ( Nana Patole म्हटलं आहे.
मग त्याला ब्राह्माणांचा जिहाद म्हणायचं का?
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले. ते म्हणतात मी चिठ्ठी वाटायला गेलो होतो. ही बाब हास्यास्पद आहे. किती खोटं बोलणार? देवेंद्र फडणवीस यांचे पीए असणारे वानखेडे हे आर्वीमधून उभे आहेत. त्यांच्या मतदारसंघात दारुबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारु सापडली. वर्धा दारुबंदीचा जिल्हा आहे. दारु आणि पैसा यांचं वाटप करुन हे नोट जिहाद करु इच्छितात का? भाजपाकडून व्होट जिहादचा नारा दिला जातो. खरंतर मतदान करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केलं की भाजपाला मतदान करणार, त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचं का? काय चाललं आहे हे महाराष्ट्रात? ज्यांना मतदान करायचं आहे त्यांचा तो अधिकार आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.