
मुंबई (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा भार त्यांच्याकडे दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. स्वतः छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी दर्शवत थेट अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या नाराजीनाट्यावर पडदा पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री महत्त्वाची मानली जात आहे.छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असावेत अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा होती. देवेंद्र फडणवीस स्वतः रिक्त झालेल्या मंत्रिपदावर छगन भुजबळ यांची वर्णी लागावी यासाठी आग्रही होते. तसेच छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवारांकडे मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता., असेही सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेने भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दूरावले होते. जहाँ नही चैना, वहा नही रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला. भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजप या पक्षातून दिली गेली. त्यामुळे भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती असं स्पष्ट झालं आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिले आहे. त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसींचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपची होती. त्यामुळे भुजबळांनी देखील तीच संधी हेरली व या काळात भाजपसोबत जवळीक साधली.
धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते आहेत. मात्र ते आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे ते अडचणीत आले, त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मध्यंतरीच्या भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक वाढवली. भुजबळ यांनी डिसेंबरमधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली होती. ना की अजित पवार यांची. आताही जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळांनी मंत्रिपदाची सेटींग लावली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सावरलं असं बोललं जातं आहे.
यह तो झाकी है- लक्ष्मण हाके
छगन भुजबळांचा समावेश यह तो झाकी है…,असं लक्ष्मण हाके म्हणाले. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात आणि सुप्रिया सुळे यांचा केंद्रामध्ये समावेश काही दिवसात महाराष्ट्राला पाहायला मिळेल, या सर्वांना सदिच्छा…, असं लक्ष्मण हाकें यांनी म्हंटलं आहे. आगामी पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी समोर आणि ओबीसी नेत्यांसमोर आव्हानांचे प्रश्न आहेत. त्यामुळे छगन भुजबळांच्या समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
भुजबळांना चॉकलेट दिलंय-जरांगे
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल, असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांना तात्पुरता नादी लावलं असेल, चॉकलेट दिलं असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विरजण पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याच काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल. छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या, हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.