
मुंबई (प्रतिनिधी) खासदारांचं शिष्टमंडळ ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली? हे स्पष्ट करणार आहे. या शिष्टमंडळावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरून कोणीही स्थानिक राजकारण करू नये, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले होते की, शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. शरद पवार गट व एकनाथ शिंदे गटाच्या तुलनेत आमचा एक सदस्य जास्त आहे. लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे होती. यावरून स्पष्ट होते की सरकार इथेही राजकारण करत आहे. विरोधी पक्षांचे जे सदस्य चालले आहेत, त्यांनी या दौऱ्यावर बहिष्कार टाकला पाहिजे,
कोणीही राजकारण करू नये : शरद पवार
संजय राऊत यांच्या टीकेबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, हा पक्षावर निर्णय नसतो. जेव्हा नरसिंह राव यांचे सरकार होते, त्यावेळी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ नेमले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिष्टमंडळ नेमण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मी देखील सदस्य होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळेस येतात, त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते. आज सरकारने शिष्टमंडळ केले, देश वाटून दिले. भारताची भूमिका काय आहे? ती सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ आहे. त्यांचे मत काय हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे एक सदस्य आहेत, असं दिसतंय. मात्र कोणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
खा. युसूफ पठाणचा नकार.
या संसदीय पक्षात पश्चिम बंगालचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) खासदार आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले.
शिष्टमंडळात समाविष्ट असणाऱ्या युसूफ पठाणने मोठा निर्णय घेत भारत सरकारला, आपण या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही. ” असे म्हटले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,”पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या गटात युसूफ पठाण यांचा समावेश केला जाणार नाही. तसेच भारत सरकारने थेट खासदार युसूफ पठाण यांच्याशी संपर्क साधला होता.
शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही -युसूफ पठाण
खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचे नाव समाविष्ट करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसशी कोणताही सल्लामसलत झाली नव्हती. भारत सरकारने थेट युसूफ पठाणशी संपर्क साधला होता आणि आता पठाणने भारत सरकारला कळवले आहे की शिष्टमंडळासोबत परदेशात जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही ”
परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय – टीएमसी.
टीएमसीने परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळातून युसूफ पठाण यांनी आपले नाव मागे घेतल्यानंतर, टीएमसीने म्हटले आहे की परराष्ट्र धोरण हा भारत सरकारचा विषय आहे. याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे. हे उल्लेखनीय आहे की जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
प्रियंका चतुर्वेदीकडून मोदींचे कौतुक…
त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत.
एकाच पक्षाचे दोन खासदार एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या भाषा बोलत आहेत. यामुळे पक्षात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे प्रियंका चतुर्वेदी त्याचे कौतुक करत आहेत.
खरं तर, ऑपरेशन सिंदूर नंतर, केंद्र सरकार जगभरात ७ बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवत आहे. यामध्ये अनेक पक्षांचे खासदार समाविष्ट आहेत. यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळही जात आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचेही गट २ मध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सरकारचे आभार मानले.
प्रियांका चतुर्वेदी यांची पोस्ट
शिवसेना (यूबीटी) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले आणि लिहिले की, “मिशन सिंदूरचा भाग असणे आणि रविशंकर जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम युरोपला जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणे हा माझा खरोखरच सन्मान आहे. दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर उघड करण्याचा हा आमचा संयुक्त प्रयत्न आहे. हा आमचा प्रतिकार आहे.” या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, किरेन रिजिजू आणि राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत.
