
बीड- “संगीत शिक्षण किंवा संगीत साधना हे एक उत्तम माणूस घडवण्यासाठीचे एक माध्यम आहे”. मन प्रसन्न करणारे, वातावरण प्रफुल्लित ठेवणारे संगीत, “भूपाळी”चे स्वर कानावर पडल्यावर ते जाणवते. अंगाईगीत लागले की शांत झोप लवकर येते, इतकेच काय तर पाऊस पाडण्याची शक्ती शास्त्रीय संगीतात आहे हे पुरातन सत्य आहे. मंत्रघोष -घोषणा, हर- हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, राम कृष्ण हरी यातून जशी मनाला एक उभारी प्राप्त होते, मन लीन होते, कार्यप्रवण होते तसेच संगीत क्षेत्रातील माणूस घडत जातो तो कधीच बिघडत नाही हे सत्य आहे.

भावगीत, भक्तीगीता सोबतच देशभक्तीपर गीतांचा मोठा प्रभाव माणूस आणि राष्ट्र घडवण्यासाठी होत असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते “जयस्तुते” ने मजसी ने परत मातृभूमीला किंवा छत्रपती शिवरायांची आरती हे सर्व देशभक्तीकडे मनाला ओढून घेऊन जातात, देशभक्ती मनामनात पेटवतात, प्रज्वलित मनात राष्ट्रकार्यासाठी समर्पित भाव निर्माण करतात, असेच संगीत शिक्षण आणि संगीत साधनेचे व्रत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनी अंगीकारलेले आहे, भारतीय शिक्षणातून, संगीत साधना, माणूस घडवणारी शिक्षण पद्धती , शिक्षणातून पिढीला मिळावी यासाठी राष्ट्रवादी विचार घेऊन 75 वर्षांपूर्वी आंबेजोगाई येथून ही एक शिक्षण संस्था सुरू झाली आहे, अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षण, धडे गिरवणे, टक्केवारी मिळवून देत नोकरीसाठी पात्र ठरणारे शिक्षण देणारे शाळा महाविद्यालय, एवढं ध्येय- धोरण, कर्तव्य असू नये तर शिक्षणातून माणूस घडवला जावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी शिक्षणप्रेमी -राष्ट्रप्रेमी मंडळी सातत्याने विचार आणि अंमल करणारी एकत्र येऊन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा जात आहेत. ध्येयवादाने प्रेरित होऊन सर्व शैक्षणिक कुटुंब, संस्था परिवार या क्षेत्रात कार्यरत आहे.मी याच संस्थेच्या संस्कार केंद्रात शिकलेलो असल्यामुळे माजलगाव येथे श्री.प्राणेश पोरे गुरुजी आज चैतन्य आहेर बीडमध्ये सौ. वासवदत्ताताई हासेगावकर आणि आज मुकुंद मिरगे सर आंबेजोगाई जयेंद्र कुलकर्णी, पुराणिक लातूरमध्ये किरणराव भावठाणकर आज संतोष बीडकर सर यांची मी साधना, संगीत सेवा पाहिली -श्रवण केलेली आहे.
शाळा -महाविद्यालय, ज्ञान मंदिराचे वातावरण भारावून टाकणारे गीत गायन, पद्य, राष्ट्रगीत, प्रार्थना, पोवाडे, स्नेहसंमेलनातील कार्यक्रम, स्वागत असो की निरोप समारंभ यावेळी सर्वांच्या ओठावर आणि कायमचे मनावर कोरून ठेवणारे संस्कार आयुष्यभर शिदोरीप्रमाणे सोबत करत असतात.
नुकतेच संभाजीनगर येथील त्रैवार्षिक शिबिरात झालेले “मातृभूमीच्या कल्याणास्तव, कर्ममयी पुरुषोत्तम होऊ” हे गीत कानातून थेट हृदयात साठवते आणि बुद्धीला प्रेरित करते, असेच झाले. नुकताच श्री.संतोष बीडकर सरांचा पुण्यात महाराष्ट्र गंधर्व राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेत ती यशाबद्दल ज्येष्ठ-श्रेष्ठ गायिका फैयाज यांच्या हस्ते मोठा गौरव झालेला आहे. आपल्याभाशिप्र संस्थेतील प्रत्येक विषयावर प्रभुत्व मिळवून, गौरव प्राप्त शिक्षक मंडळी आहेत पण त्यापेक्षा त्यांनी घडवलेली मुले- मुली, विद्यार्थी हे देखील मोठा गौरव मिळवून देणारे घडत आहेत.
नुकताच शिवजयंती उत्सव सावरकर शैक्षणिक संकुलाने खूप छान साजरा केला, यावेळी तबला -पेटी आणि गीत- गायन, पोवाडे सादर करणारा विद्यार्थ्यांचा चमू थक्क करणारा होता. , संस्थेचा पुरेपूर प्रयत्न असतोच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा पण या नव्या शैक्षणिक धोरणानुसार याची जास्त काळजी घेतली पाहिजे आणि शिक्षणातून माणूस घडवणारे पूरक संस्कार देण्यासाठी अधिक व्यवस्था होईल हीच अपेक्षा आणि आशा…
हे सर्व आठवण्याचे आणि लिहिण्याचे कारण की स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच, मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यासाठी, स्वरसुमनांजली वाहण्यासाठी, स्मरण आणि पूजन करणारा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम , सायंकाळी 5 वाजता, सावरकर महाविद्यालयाच्या प्रांगणावर सादर करणार आहेत, बीड शहरातील सर्व सावरकर प्रेमी, देशभक्त नागरिक बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी हाच या मागचा अट्टाहास..
प्रमोद कुलकर्णी,पत्रकार बीड
(९४०३९०४६५१)