भरतनाट्यमने संस्कार भारतीचा भरतमुनी स्मरण दिन संपन्न.

बीड(प्रतिनिधी) भरतमुनींनी ब्रह्मदेवाच्या आदेशाने नाट्यशास्त्राची निर्मिती केली. नाट्यशास्त्र हा संस्कृत मधील ग्रंथ सर्व भारतीय कलांचा मूळ ग्रंथ असून यात नाट्य ,संगीत, नृत्य आणि पठण या ललित कलांचा उगम दिसून येतो असे प्रतिपादन संस्कार भरतीच्या अनिवार्य कार्यक्रमापैकी एक असणाऱ्या भरतमुनी स्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांत प्रचार व प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे यांनी केले.
भरतमुनी स्मरण दिनानिमित्त बीड संस्कार भारतीच्या वतीने साई नृत्यलयाच्या विद्यार्थिनींच्या भरतनाट्यमचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थीनिनी आपल्या बहारदार नृत्याने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे संरक्षक भारत लोळगे आणि प्रचार व प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताचे मंत्री प्रमोद वझे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश तालखेडकर यांनी मानले.हा कार्यक्रम कै. भाऊसाहेब चिंचोलकर स्मृती सभागृहात संपन्न झाला.

पुढे बोलताना महेश वाघमारे म्हणाले की ,नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी 6 हजार श्लोक आणि 36 हजार सूत्र लिहिली आहेत. त्यांनी शरीराच्या 10 मुद्रा, मानेच्या आणि हाताच्या 36 मुद्रा आणि डोक्याच्या 13 मुद्रांचा समावेश केला. नृत्यातील या सिद्धांताचा नृत्य कलेतील विविध शाखांनी उपयोग केला आणि त्याचा विस्तारही करीत कंठ आणि वाद्यांत एकरुपता आणून नृत्यकला अधिक समृद्ध केल्या आणि एखाद्या कथेच्या,कथानकाच्या सादरीकरणासाठी नाटक म्हणूनही उपयोग केला गेला.

याप्रसंगी गुरू अनुराधा चिंचोलकर यांच्या साई नृत्यालयाच्या विद्यार्थिनी दृष्टी पवार आणि गौरी वाघमारे यांनी गणेश,नटराज,सरस्वती,लक्ष्मी या देवतांचे श्लोक आणि नटूवंगम सादर केले, त्यांना तट्टकळीवर रश्मी थिगळे यांनी साथ केली.नंदिनी व्यवहारे आणि अन्विता जाधव यांनी पुष्पांजली ,आर्या कुलकर्णी आणि श्रावणी रुईकर यांनी सरस्वतीकौतुकम आणि ‘श्री रामचंद्र कृपालू भज मन’ या तुलसीदास यांच्या भजनावर भरतनाट्यममधील पद्म या नृत्यप्रकारात नृत्य सादर केले. या दोघीनीच तिल्लाना हा नृत्यप्रकार सादर करून या सुंदर कार्यक्रमाचे समापन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे साहित्य विधाप्रमुख डॉ.विद्यासागर पाटांगणकर, जगदीश पिंगळे, संतोष पारगावकर, सौ.स्नेहल पारगावकर ,लक्ष्मीकांत सौंदत्तीकर ,अनिल कुलकर्णी ,डॉ. राहुल पांडव ,सुरेश साळुंके, महेश देशमुख,अशोक कुलकर्णी. सुरभी खोपटीकर आदींनी परिश्रम घेतले.