
शिर्डी (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आधुनिक भारताचे चाणक्य असा उल्लेख केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतील यशाचं श्रेय त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडत आहे. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या महाधिवेशनाला हजेरी लावली आहे. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांन मार्गदर्शन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रात जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला, त्यासाठी आपल्या सर्वांना मी दंडवत करतो. तुमच्यामुळे (भाजप कार्यकर्ते) हा विजय मिळवता आहे. अमित शाहजी आपल्यासोबत 24 तास सोबत होते. लोकसभेतील पराभवानंतर सर्वजण विचारात होते की आपला पराभव कशामुळे झाला. कार्यकर्ते खचले होते, निराश होते. अशावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रात दौरा केला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवउर्जा भरली. त्यानंतर संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि पक्षाने महाविजय मिळवून दाखवला. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने अमित शाह यांचे देखील आभार व्यक्त करतो.”
श्रद्धा-सबुरीचा मंत्रामुळे यश- फडणवीस
“मला आनंद आहे की हे महाधिवेशन शिर्डीत घेतलं. साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला आहे. भाजपमध्येही राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे. त्यानंतर अखेरीस आपण म्हणजे सबुरी आहे. हा संदेश आपण सतत पाळत असतो. ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. ज्यांना हा संदेश समजला नाही त्यांची हालत खराब झाली, आपण विधानसभेत पाहिलं”, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
“महाराष्ट्रात तीनवेळा 100 पेक्षा जागा मिळवणारा भाजप एकमेव पक्ष आहे. जी 20, जी 7 असतं तसं भाजपचं जी 6 तयार झालं आहे. गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, हरयाणा यांच्यासोबत महाराष्ट्र जोडला आहे. जिथे विजयाची हॅटट्रिक झाली आहे. लोकसभेत आपण 35 टक्क्यांनी काठावर पास झालो, मात्र मनातून नापास झालो होतो. त्यानंतर ज्याप्रकारचे प्रयत्न आपण केले. मोदींच्या नेतृत्त्वात ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला. त्यानंतर 248 पैकी 237 जागा जिंकून महाराष्ट्रात इतिहास घडवला. महायुतीने 82 टक्के गुण मिळवणे आणि भाजपने तर 89 टक्के गुण मिळवले. भाजप मेरिटमध्ये पास झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचा एखाद्या पक्षाचा हा सर्वात मोठा विजय आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
या विजयाचे शिल्पकार कोण याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाभारताचं उदाहरण दिला. फडणवीस यांनी म्हटलं की, “निवडणुकीच्या युद्धात लोकांचा विश्वास जिंकण्याकरता पार्थाची किंवा केशवाची भूमिका तुम्ही (भाजप कार्यकर्ते) निभावली आणि मोदीजी माधव होते. केशव आणि माधवामुळे हा विजय मिळवता आला. त्यामुळे हा विजय भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुमचे आभार मानतो.”
आराजकातावादी निवडणुकीत पराभूत
“लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधानविरोधी शक्तींचा प्रादुर्भाग पाहायला मिळाला. आपले विरोधक काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी (राशप) यांच्या लक्षात आलं की मोदींना किंवा भाजपला आपल्याला पराभूत करता येत नाही. त्यावेळी त्यांनी देशात आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात आपण फेक नॅरेटिव्ह पाहिलं, व्होट जिहाद पाहिलं. मात्र मागील सहा महिन्यात राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्र येत राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं. आराजकातावादी ताकदीला निवडणुकीत पराभूत केलं. मात्र त्यांच्या कारवाया अजून थांबलेल्या नाहीत. ही लढाई आपल्याला आणखी घट्ट करावी लागेल, असं देखील फडणवीसांना कार्यकर्त्यांना सांगितलं.
“महाराष्ट्रात आपल्याला परिवर्तन करायचं आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. राज्याला दुष्काळमुक्त करण्याकरता नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. दुष्काळ आता भुतकाळ करायचा आहे. महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न सरकारने पाहिलं आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुभलाम झाला पाहिजे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
सर्व योजना पूर्ण करणार
“लाडक्या बहिणींना आपण मदत करत आहोत आणि पुढेही करत राहणार आहोत. लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार. मी एकच सांगतो महिला, शेतकरी, युवा, गरीब, दिव्यांग समजातील जेवढ्या घटकांसाठी योजना सुरु केल्या आहेत, त्या सर्व पूर्ण करणार आहोत. तसेच घोषणापत्रात जे सांगितलं ते देखील पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज..
“येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. 3-4 महिन्यात निवडणुका होतील. या निवडणुकांचा तयारी आपल्याला करायची आहे. जसा महाविजय विधानसभा निवडणुकीत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील मिळवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावं”, असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं.