
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे दारूची दुकाने वाढवून समाजाची वाट लावली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन वीस बिअरबारला मंजुरी दिल्याने आता जिल्यातील दारू दुकानांची संख्या आठशे चाळीस वर गेली आहे. आता तरी दारुड्यांची संख्या वाढवू नका. नवीन दारू दुकाने देऊ नका, अशी मागणी जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात बिअरबार, देशी दारू, वाईन शॉप, होलसेल अशी एकूण आठशे एकोन चाळीस एवढी दारू दुकानांची संख्या आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या असताना त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात दारू दुकाने दुकानांना परवाना देण्यात आले
दि. १ जानेवारी २०२३ पासून दि. १५ जून २०२४ या साधारणतः दीड वर्षाच्या काळामध्ये शहात्तर नवीन लायसन देण्यात आले. या दिड वर्षात देण्यात आलेल्या शहात्तर लायसन पैकी फक्त वीस लायसन अविनाश पाठक यांनी दिली. बाकीची लायसन तत्पूर्वीच्या जिल्हाधिकारी मुंडे यांनी दिले आहेत.एकीकडे गुन्हेगारी पर्व वाढत आहे. तर दुसरीकडे मद्य विक्री परवाण्याची संख्या वाढवून जनजीवन विस्कळीत केले जात आहे. जिल्हाधिकारी पदावर अविनाश पाठक हे रुजू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की, जिल्ह्यात एकही बिअर बार मंजूर करणार नाही. पण हा शब्द फेल ठरला. आणि त्यांनी वीस बिअरबार मंजूर केले. एक बिअरबारला पाच लाखापेक्षा जास्त खर्च येत असल्याचे काहींनी आम्हाला सांगितले. त्यामुळे बियरबारला मंजुरी देताना कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची आणि भ्रष्ट कारभार झाल्याचे समोर येत आहे. प्रशासनापेक्षा बाहेरच्या लोकांनी मलिदा मारल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील लोकांनी लाजा सोडल्याने समाजाचे वाटोळ होत आहे. दारू दुकान मंजूर करणे, हा नियम असला, तरी सामाजिक हित, आणि नैतिकता पाहिली पाहिजे. कामधंदा नाही, बेकारी वाढली आहे. गुन्हेगारी वाढली आहे. अशात दारुडे वाढविणे म्हणजे समाज व्यवस्था विस्कळीत करणे आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आता तरी नवीन लायसन देऊ नयेत, असेही ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे. तर दारू दुकाने वाढवण्याच्या मुद्द्याला आता आपण हात घालणार असून उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्यासह या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे समाज बिघडू नका, सामाजिक स्वास्थ्य जागेवर राहू द्या, दारुड्यांच्या कुटुंबाचे वाटोळ करण्यात सहभाग नोंदवू नका, राज्याचा महसूल खूप मोठा आहे. त्यातील भ्रष्टाचार कमी करा. त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या माध्यमातून नवीन दारू दुकाने देऊन महसूल गोळा करण्याच्या भानगडीत पडून पाप करू नका, अशीही मागणी करणार असल्याचे ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.
** जिल्ह्यात आठशे चाळीस दारू दुकाने
** दिपा मुंडे यांनी छपन्न बियरबार दिले
** अविनाश पाठक यांनी वीस बार तडकाफडकी दिले
** गुंडगिरी, दारुड्यांना प्रशासनाचे प्रोत्साहन
** समाजहित पहा, नैतिकता बाळगा
** प्रशासनापेक्षा बाहेरच्या लोकांनी मलिदा मारल्याची चर्चा