
मुंबई (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा बीड जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ असणारे जयदत्त क्षीरसागर यांनी आज त्यांचे चिरंजीव रोहित क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृहात भेट घेतली आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि क्षीरसागर यांचे राजकीय संबंध खूप चांगले असून क्षीरसागर यांच्या मागणीवरून फडणवीस यांनी बीड शहरासाठी भरीव निधी या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उपलब्ध करून दिला होता ज्यामुळे आज बीड शहराला चांगल्या सुविधा मिळत आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर ते राजकारणात सक्रिय होते पण कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते,मात्र त्यांचे फडणवीस यांच्या सोबत चांगले संबंध होते ,आजही आहेत. यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांमघ्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वत: निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे उमेदवार असलेले पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला. मात्र, त्यांनी लगेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातच पुढील निवडणुका लढविणार असल्याचे म्हटले होते.क्षीरसागर हे प्रशासनाची जाण असणारे नेते असून त्यांनी राज्यमंत्रीमंडळात विविध खाती यशस्वीपणे सांभाळली आहेत.मात्र त्यांची ही भेट नेमकी कशासाठी झाली हे समजू शकले नाही,आगामी काळात जयदत्त क्षीरसागर हे अधिक सक्रियपणे राजकारण करतील असे संकेत या भेटीमुळे मिळत आहेत.