
सकाळीच पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी यांचा फोन आला, म्हणाले वाघमारे, तो झाकीर हुसेन यांच्यावर आज आलेला अग्रलेख वाचा हो, खूपच सुंदर लिहिले आहे, मला ते तुमच्या संगीतातलं फार कळत नाही पण मला वाचतांना खूप भावलं, त्यातले बरेच शब्द अपरिचित वाटले.,आणि वाटलं की तुम्हाला सांगावे. त्यात भाऊंनी आणखीन एक सूचना केली, की मी तुम्हाला व्हाट्सअप वर लेख पाठवतो पण, वृत्तपत्र विकत आणून वाचण्यात जे समाधान आहे ते तुम्हाला मिळणार नाही . मी लगेच बुक स्टॉल वर गेलो आणि अंक घेऊन आलो. वाचताना भाऊंना जेवढा आवडला तेवढाच मलाही आवडला आणि मी लगेच झाकीरभाईंच्या स्मृती जागवायला लागलो.
लेखात जे जे लिहिले आहे ते खूप सुंदर लिहिले आहे. माणूसच सुंदर होता, तो जेवढा कलावंत म्हणून चांगला होता तेवढाच माणूस म्हणूनही .आज त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना अनेक जण त्यांच्या कलेवर आणि व्यक्तिमत्वावर बोलले आहेत. माझा त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग खूप लहानपणी आला होता, जालण्याच्या सरस्वती भुवन मध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्याकाळी मी कॉलेजसाठी अंबडहुन अपडाऊन करायचो, झाकीरभाईचा कार्यक्रम आहे हे समजलं आणि आम्ही तिकडं धावतच गेलो. कार्यक्रमासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्यक्ष त्या तालयोगीच दर्शन घडलं आणि त्यांच्या वादानाची जादू अनुभवली. तबला लोकप्रिय व्हावा म्हणून ते विविध ताल जसे सादर करायचे तसेच तबल्यातून ते वेगवेगळे आवाज आपल्या बोटांनी निर्माण करायचे, ज्यात रेल्वेगाडी ,नळावरची भांडणे,घोड्यांच्या टापाचा आवाज असे छोट्या मुलांना रिझवणारे खूप काही असायचे, एवढा मोठा तबलावादक हे सारं करायचा ते तबला हे वाद्यही स्वतंत्रपणे लोकप्रिय झालं पाहिजे यासाठी. नाहीतर तबला म्हणजे साथीचे वाद्य एवढीच त्याची ओळख तशी सर्वसामान्यपणे होती, मात्र आपला महानपणा बाजूला ठेवून अगदी जालन्या सारख्या छोट्या छोट्या गावात जाऊन झाकीरभाईंनी तबला वाजवला आणि तो लोकप्रिय केला .तबला हे वाद्य कायद्यात वाजवायचं वाद्य आहे .ताल, मात्रा हे सारं गणिताच्या पद्धतीने आहे ,वेगवेगळे ताल हे वेगवेगळ्या मात्रात आहेत आणि त्याचा तोल सांभाळता आला पाहिजे. हे सहज साध्य होत नाही, त्यासाठी मोठा रियाज लागतो ।वयाच्या तिसऱ्या वर्षीच झाकीरभाईंना त्यांच्या वडिलांनी तबला वाजवायला दिला, सुरुवातीला लाकडाच्या ओंडक्यावर ते त्यांना वाजवायला लावायचे ,कधी कधी तर बोटातून रक्त सुद्धा यायचं पण झाकीरभाईंनी ही साधना मनःपूर्वक केली. असं सांगतात की झाकीरभाईचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कानात पवित्र कुराणच्या आधी अल्लारखासाहेबांनी तबला वाजवला होता आणि तबल्याचे ते सुर झाकीरभाई अनंताच्या प्रवासापर्यंत त्यांच्यासोबत होते. लय आणि ताल घेऊन जन्माला आलेल्या या महान माणसाने फक्त तबला आणि तबला एवढाच ध्यास घेतला होता. आज तबलावादनाच्या एकल मैफिली मोठ्या प्रमाणावर होतात त्यांना प्रतिसादही मिळतो पण त्यामागे जाकीर हुसेन यांनी केलेले मोठे कार्य आहे. अलीकडच्या काळात कोरोना साथीनंतर ते पुण्यात आले होते , सा व नी या संस्थेने त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझे बंधू मंगेश वाघमारे यांच्याकडे होते . योगायोगाने मीही त्या काळात पुण्यात होतो ,.खूप वर्षांनी झाकीरभाई पुण्यात येत आहेत म्हणून लोकांनी तुडुंब गर्दी केली होती ,एखाद्या पॉप सिंगर लऐकायला पाहायला जसे लोक झुंबड करतात अगदी तसेच वातावरण झाकीरभाईच्या पुण्यातल्या त्या कार्यक्रमात होते. सारी तिकीटे बुक झाली होती आणि लोक झाकीरभाई कधी व्यासपीठावर येतात याची वाट पाहत होते, झाकीरभाई आले त्यांनी सुरुवातीला त्यांनी पं. उल्हास कशाळकर यांची साथ केली, गायनाला किती संयमीतपणे आणि गाणे खुलवणारी साथ करावी लागते हे त्यांनी त्या दिवशीही दाखवून दिले आणि नंतर सतारवादक निलांद्रीकुमार यांची साथ केली, या दोघांनी तर आपल्या वादनाने धमाल उडून दिली. जाकिरभाईंच्या बोटाची जादू वयाच्या सत्तरीतही अगदी तशीच होती जशी त्यांच्या उमेदीच्या वयात होती. माझे भाग्य की मला त्यांना प्रत्यक्ष ऐकता आले. या विनम्र माणसाने सुरुवातीलाही त्यांचा डग्गा आणि तबला आपल्या हाताने व्यासपीठावर आणला आणि कार्यक्रम झाल्यावर आपल्या हातानेच तो परत नेला.हा माणूस त्याच्या वादनाने जेवढा लोकप्रिय ठरला तेवढाच किंवा त्या पेक्षा जास्त आपल्या “सदवर्तनाने लोकांच्या मनात रुजला. आज झाकीरभाई आपल्यात नाहीत ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले असले तरी त्यांनी भारतीय अभिजात संगीताच्या साठी जे जे केले आहे ते अतुलनीय आणि अवर्णनीय आहे .असाही कोणी वादक झाला होता यावर पुढच्या काळात कुणी विश्वासही ठेवणार नाही, त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी ज्यांना ज्यांना मिळाली ते ते भाग्यवान आणि त्यातलाच मीही.
झाकीरभाईंना,
भावपूर्ण श्रद्धांजली!